हे राजा! काशिराज, महाधनुष्यधारी, महापराक्रमी शिखंडी तसेच धृष्टद्युम्न आणि राजा विराट, अपराजित सात्यकी, राजा द्रुपद आणि द्रौपदीचे पाच पुत्र, तसेच सुभद्रेचा पुत्र दीर्घबाहू अभिमन्यु – हे सर्व आपापले शंख सर्व बाजूंनी फुंकू लागले.
टीका: महापराक्रमी शिखंडी अतिशय शूर होता. पूर्वजन्मी तो स्त्री होता (काशीराज अंबेची कन्या) आणि या जन्मीही तो राजा द्रुपदाला कन्यारूपानेच प्राप्त झाला. नंतर याच शिखंडीने स्थूणाकर्ण या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुषरूप धारण केले. भीष्माला ही सर्व हकीकत माहित होती आणि त्यांनी शिखंडीला स्त्रीच समजले. या कारणाने ते त्यावर बाण टाकणार नव्हते. युद्धात अर्जुनाने त्याला समोर ठेवून भीष्मावर बाणांचा वर्षाव केला व त्यांना रथापासून खाली पाडले.
अर्जुनाचा पुत्र अभिमन्यु अतिशय शूर होता. युद्धात त्याने द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अनेक वीरांना नाश केला. शेवटी कौरव सेनेतील सहा महारथींनी त्याला अयोग्य रीतीने वेढून शस्त्रांनी आक्रमण केले. दुःशासनाच्या पुत्राने त्याच्या डोक्यावर केलेल्या गदाप्रहारामुळे त्याचा मृत्यू झाला.
शंखनादाचे वर्णन करताना संजयाने कौरव सेनेतील शूर वीरांमध्ये फक्त भीष्माचे नाच घेतले, तर पांडव सेनेतील शूर वीरांमध्ये भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी अठरा महारथींची नावे घेतली. यावरून असे दिसते की संजयाच्या मनात अधर्माच्या बाजूचा (कौरव सेनेचा) आदर नाही. म्हणून तो अधर्माच्या बाजूचे विस्तृत वर्णन करणे योग्य नाही असे मानतो. तर, धर्माच्या बाजूचा (पांडव सेनेचा) आदर त्याच्या मनात आहे आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवांबद्दल भक्तिभाव आहे, म्हणून त्यांच्या बाजूचे विस्तृत वर्णन करणे योग्य समजतो आणि फक्त त्यांच्या बाजूचे वर्णन करण्यात आनंद अनुभवतो.
संदर्भ: पांडव सेनेच्या शंखनादाचा कौरव सेनेवर काय परिणाम झाला, हे पुढील श्लोकात सांगितले आहे.
★🔗